12 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 फेब्रुवारी 2019)
अबुधाबीत हिंदीला कोर्टाच्या तिसऱ्या अधिकृत भाषेचा दर्जा:
- संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी अबुधाबीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अरबी आणि इंग्रजी भाषेनंतर अबुधाबीने हिंदी भाषेचा कोर्टाची तिसरी अधिकृत भाषा म्हणून समावेश केला आहे.
- लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण अबुधाबीमध्ये हिंदी भाषिकांची संख्या खूप मोठी आहे.
- अबुधाबीच्या न्याय विभागाने (एडीजेडी) म्हटले की, नोकरीच्या प्रकरणांमध्ये अरबी आणि इंग्रजीसोबतच हिंदी भाषेचा समावेश करीत कोर्टासमोर येणाऱ्या याचिकांवर सुनावणी होण्यासाठी भाषेच्या माध्यमाचा विस्तार केला आहे.
- हिंदी भाषिक लोकांना खटल्याची प्रक्रिया, त्यांचे अधिकार आणि कर्तव्यांबाबत माहिती मिळण्यास मदद व्हावी हा या मागचा हेतू आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या लोकसंख्येत सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या ही परदेशी प्रवाशी लोकांची संख्या आहे. - इथे भारतीयांची लोकसंख्या 26 लाख आहे. ही लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के आहे. अबुधाबीतील हा सर्वांत मोठा प्रवासी समाज आहे.
- तसेच या नव्या निर्णयासोबतच हिंदी भाषिकांना अबुधाबीच्या न्यायिक विभागत अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- अबुधाबीच्या न्यायिक विभागाचे अंडर सेक्रेटरी युसूफ सईद अल आबरी म्हणाले, आम्ही न्याय प्रक्रियेला अधिक पारदर्शी बनवू पाहत आहोत. त्यासाठी 2021 साठी नवी योजना आम्ही आखली आहे.
हजारिकांच्या कुटुंबियांचा सर्वोच्च पुरस्कारावर बहिष्कार:
- आसाममध्ये नागरिकत्व विधेयकाचा वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. आता नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात दिवंगत ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांच्या कुटुंबियांनी ‘भारतरत्न’ पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.
- तर हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने भूपेन हजारिका यांना प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारी रोजी भारतरत्न जाहीर केला होता.
- अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या तेज हजारिका यांनी आसामच्या स्थानिक वाहिनीसोबत बोलताना हा सन्मान आम्ही स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे तेज यांनी नमूद केले.
- दुसरीकडे, भूपेन हजारिका यांचे मोठे बंधू समर हजारिका यांनी, ‘भारतरत्न’ पुरस्कार न स्वीकारण्याच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचे म्हटले आहे. ‘भारतरत्न पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय त्यांचा मुलगा तेजचा आहे. मात्र, या निर्णयाशी मी सहमत नाही. भूपेन यांना भारतरत्न मिळण्यास आधीच बराच उशीर झाला आहे’, असे ते म्हणाले.
देशातील सर्वात वेगवाग रेल्वे ‘ट्रेन-18’:
- देशातील सर्वात वेगवान ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला खिसा देखील खाली करावा लागणार आहे. भारतीय रेल्वेची पहिली इंजिनविरहित आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीची असलेली ट्रेन अर्थात ‘ट्रेन-18’ किंवा ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला 15 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली ते वाराणसी प्रवासासाठी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यापूर्वी या ट्रेनचे तिकीट दर जाहीर करण्यात आले आहेत.
- या ट्रेनमधून दिल्लीहून वाराणसीला एसी डब्ब्यातून प्रवासासाठी 1850 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तर एक्झिक्युटिव्ह क्लासमधून प्रवासासाठी 3520 रुपये मोजावे लागतील. यामध्ये जेवणाची रक्कम समाविष्ट आहे.
- तर परतीच्या प्रवासासाठी एसी चेअर कारचे तिकीट 1795 रुपये असेल आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 3470 रुपये मोजावे लागतील. ‘शताब्दी’च्या तिकीटदरांशी तुलना केल्यास ट्रेन-18 चे चेअरकारचे तिकीट दीडपट आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट 1.4 पट अधिक आहे.
- प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल अशी रचना या ट्रेनची आहे. 16 डब्ब्यांच्या या ट्रेनमधील 14 डबे ‘नॉन एक्झिक्युटिव्ह’ तर दोन डबे ‘एक्झिक्युटिव्ह’ असतील. ही ट्रेन येत्या काळात ‘शताब्दी एक्सप्रेस’ची जागा घेईल.
ग्रॅमी पुरस्कारात यंदा महिलांची बाजी:
- 2019च्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात कॅसी मुसग्रेव्ह, कार्डी बी व लेडी गागा या महिला संगीतकारांचा दबदबा राहिला. पुरुष कलाकारांचे वर्चस्व असलेल्या गटातील सर्व ग्रॅमी पुरस्कार या महिलांनी पटकावले आहेत.
- ग्रॅमी पुरस्कारात महिलांना फारसे महत्त्व दिले जात नाही अशी टीका गेल्या वर्षीच्या पुरस्कार कार्यक्रमात झाली होती. त्याची दखल घेत ध्वनिमुद्रण अकादमीने यावेळी महिलांना केंद्रस्थानी ठेवले. विजेते, सादरकर्ते व यजमान या सर्व पातळ्यांवर महिलांचेच वर्चस्व राहिले.
- अकादमीचे मावळते अध्यक्ष नील पोर्टनाऊ यांच्यावर नव कलाकार विजेत्या दुआ लिपा हिने टीका केली. महिलांनी आपली पायरी उंचावली पाहिजे तरच त्यांना ग्रॅमी पुरस्कारात चांगले स्थान मिळेल, अशी खोचक टीका पोर्टनाऊ यांनी गेल्या वर्षी केली होती.
- अलिशिया कीज या यजमान होत्या. चौदा वर्षांनंतर हा मान महिलेला मिळाला, त्यांनी माजी प्रथम महिला मिशेल ओबामा, लेडी गागा, जेनीफर लोपेझ व जॅडा पिंकेट स्मिथ यांची नावे पुकारून सर्वाना धक्का दिला.
‘आयआयटी’, ‘आयआयएम’ची क्षमता वाढली:
- खुल्या गटातील दहा टक्के आरक्षणामुळे देशातील केंद्रीय शिक्षण संस्थांमधील प्रवेश क्षमता 25 टक्क्यांनी वाढली आहे. मूळच्या जागांना कोणताही धक्का न लावता खुल्या गटाला आरक्षण दिल्याने क्षमतेत ही वाढ झाली आहे.
- तर या निर्णयामुळे ‘आयआयटी‘,’एनआयटी‘ व ‘आयआयएम’मधील प्रवेश क्षमता 15 हजारांनी वाढेल, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासह देशातील इतर केंद्रीय संस्थांमध्ये तब्बल 2 लाख 15 हजार 460 जागांची वाढ होणार आहे.
- यातील निम्म्या जागा येत्या शैक्षणिक वर्षात, तर उर्वरित जागा पुढच्या शैक्षणिक वर्षात वाढविण्यात येणार आहेत. केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश क्षमता वाढणार असल्याने ‘आयआयटी’मधील प्रवेश क्षमता 6708, ‘एनआयटी’मधील 7256 आणि ‘आयआयएम’मधील प्रवेश क्षमता 1363 ने वाढणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर पाच हजार 676 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
- तसेच या संदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, देशाच्या उच्च शिक्षणक्षेत्रातील हा एक मोठा निर्णय असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
दिनविशेष:
- उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 मध्ये झाला होता.
- संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 मध्ये झाला.
- पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते सन 1976 मध्ये हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण करण्यात आले होते.
- सन 1993 मध्ये एम.एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे 25वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- सन 2003 या वर्षी आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा