उत्तर कोरियाने आज एक अज्ञात क्षेपणास्त्र डागल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या लष्कराने दिली. मात्र लगेचच हे क्षेपणास्त्र निकामी ठरलं आहे.
तर याबद्दल दक्षिण कोरियाच्या लष्कराने एक निवेदनही जारी केलं आहे.
तसेच या निवेदनात म्हटलं आहे की उत्तर कोरियाने सुनान भागातून एक अज्ञात क्षेपणास्त्र डागलं मात्र लाँच झाल्याझाल्याच हे क्षेपणास्त्र अयशस्वी झालं.
उत्तर कोरियाने बॅलेस्टिक मिसाईल डागल्याचं एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं.
उत्तर कोरियाने या वर्षात सात मिसाईल चाचण्या केल्या आहेत. तर दोन उपग्रह असल्याचं सांगितलं आहे.
ऑलिम्पियाड बुद्धिबळचे भारताला यजमानपद :
रशिया-युक्रेन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर रशियाबाहेर हलवण्यात आलेल्या 44व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान भारताला लाभणार आहे.
यंदा ही प्रतिष्ठेची स्पर्धा जुलै-ऑगस्ट या कालावधीत चेन्नईमध्ये रंगणार असल्याची घोषणा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली.
‘एआयसीएफ’ने ऑलिम्पियाड स्पर्धेच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ ‘फिडे’ला 10 मिलियन अमेरिकन डॉलर देऊ करण्याची तयारी दर्शवली.
ऑलिम्पियाड या दर दोन वर्षांनी होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत जवळपास 190 देशांचे संघ सहभागी होतात.
तर यंदा ही स्पर्धा 26 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात येणार होती.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धात भारताच्या सायना, सिंधूची विजयी सलामी :
आघाडीच्या भारतीय बॅडिमटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे.
बुधवारी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीच्या लढतीत सायनाने स्पेनच्या बीएट्रीज कोरालेसला सरळ गेममध्ये पराभूत केले.
सिंधूने देखील चीनच्या वांग झी यीविरुद्ध विजय नोंदवला. सायनाने स्पॅनिश प्रतिस्पर्धीला पहिल्या फेरीत 38 मिनिटे चाललेल्या लढतीत 21-17, 21-19 असे पराभूत केले.
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धात भारताचा दुसरा पराभव :
फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे गतविजेत्या इंग्लंडकडून बुधवारी ‘आयसीसी’ महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला पराभव पत्करावा लागला.
सलग तीन सामने गमावलेल्या इंग्लंडने हा सामना चार गडी आणि 112 चेंडू राखून जिंकत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.
भारतीय संघाच्या कामगिरीत पुन्हा एकदा सातत्याचा अभाव पाहायला मिळाला.
तर या लढतीतील पराभवानंतरही भारतीय संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान राखले.
भारतीय संघाचे चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह चार गुण आहेत.
दिनविशेष :
17 मार्च 1882 हा दिवस आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर’ यांचा स्मृतीदिन आहे.
भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म 17 मार्च 1909 रोजी झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म 17 मार्च 1927 रोजी झाला.
17 मार्च 1969 रोजी ‘गोल्ड मायर’ ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला 17 मार्च 1997 मध्ये सुरवात झाली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.