Current Affairs of 22 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 मे 2018)
भारत रशियाची विशेष व्यूहात्मक भागीदारी :
- भारत आणि रशियाचे संबंध आता विशेष व्यूहात्मक भागीदारीच्या स्तरावर पोहोचले आहेत आणि हे मोठे यश आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देशांच्या मैत्रीचे वर्णन केले.
- पंतप्रधान मोदी सध्या रशिया दौऱ्यावर गेले असून त्यांनी सोची येथे रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले.
- सोची येथे दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाच्या भेटीपूर्वी पुतिन यांनी मोदींचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी अनौपचारिक चर्चा केली. दोन्ही देशांतील मैत्री आणि विश्वासाचा वापर करून जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या मुद्दय़ांवर एकमत तयार करणे हे या भेटीचे उद्दिष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):
सोलापूरच्या विकासासाठी स्पेनकडून सहकार्य :
- शाश्वत शहरी विकास योजनेंतर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान 24 मे रोजी सामंजस्य करार होणार आहे. त्यासाठी स्पेनचे शिष्टमंडळ सोलापुरात येणार आहे. महापालिकेच्या वतीने महापौर व आयुक्त या कराराव स्वाक्षरी करतील.
- युरोपियन युनियनने आशिया आणि उत्तर-दक्षिण अमेरिकातील शहर आणि भागीदार शहरातील शाश्वत शहरी विकासावर सहकार्य वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय शहरी सहकारिता कार्यक्रम विकसित केला आहे. या करारांतर्गत स्थानिक नेत्यांना विकास समस्यांना हाताळण्यावर नवीन दृष्टीकोन ठेवून संपर्क साधता येणार आहे.
- आंतरराष्ट्री शहरी सहकार्य कार्यक्रमांतर्गत शहरांच्या जोडीला पुढाकार घेण्यासाठी मलेशियातील क्वालालांपूरमधील फोरममध्ये सुरवात करण्यात आली आहे. त्याचे समर्थन करण्यासाठी भारत कार्यक्रम महापालिका यांच्यात भागीदारी करार होणार आहे.
- एक करार झाल्यावर भारतातील बारा शहरे युरोपियन युनियनमधील 12 शहरांशी जोडण्याची प्रक्रिया सुरु होईल. जी शहरे स्थानिक कृती आराखडाच्या (लोकल ऍक्शन प्लॅन) विकासासाठी समान शहरीकरण आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य करेल. ही योजना दोन वर्षांपर्यंत सुरु राहणार आहे.
ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :
- भारताने 21 मे रोजी ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी केली. क्षेपणास्त्राचा कार्यअवधी 10 ते 15 वर्षे वाढवणे हा या चाचणीमागचा मुख्य उद्धेश होता. भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
- डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या (डीआरडीओ) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या किनारपट्टीवर चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रातून (आयटीआर) मोबाइल लाँचरवरून सकाळी सुमारे 10.44 वाजता क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
- संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी यशस्वी चाचणीनिमित्त ब्राह्मोसचे पथक आणि डीआरडीओचे अभिनंदन केले. सुमारे 10 ते 15 वर्षांपर्यंत कालावधी वाढवलेले ब्राह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे.
- तसेच भारतीय लष्कराने आपल्या शस्त्रागरात ब्राह्मोसचा तीन रेजिमेंटमध्ये यापूर्वी समावेश केला आहे. सर्व क्षेपणास़्त्रे ही ब्लॉक-3 यंत्रणेने सज्ज आहेत.
राज्यात 2060 हवामान केंद्र कार्यान्वित :
- लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध‘ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून, त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे याचे तंत्र शेतकऱ्यांना साध्य होणार आहे.
- महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी 2060 स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन केली असून, त्याद्वारे गावस्तरापर्यंतच्या शेतकऱ्याला हवामानाचा अचूक अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे.
- हवामानाशी संबंधित सूचना आणि अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी असा उदेश आहे. गेल्या काही वर्षांतील हवामानातील वाढत्या बदलामुळे अवेळी पाऊस, गारपीट, वादळ, यांचा तडाखा पिकांना बसून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनादेखील बसला आहे. ही स्वयंचलित हवामान यंत्रणा स्कायमेट या हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्त्वावर बसविण्यात आली आहे.
प्रतिकूलतेवर मात करत काश्मिरात वीजनिर्मिती :
- निसर्गाबरोबरच प्रतिकूल सामाजिक स्थिती, दहशतवादाचे सावट आणि सैन्याच्या घडामोडी आदी सर्व परिस्थितीवर मात करीत काश्मीरच्या खोऱ्यात किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून वीज जन्मली आहे.
- श्रीनगरपासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरेझमध्ये किशनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाच्या माध्यमातून बंडीपुरा जिल्ह्यतील मंत्रीगाम गावात हा वैशिष्टय़पूर्ण जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
- नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कार्पोरेशनच्या (एनएचपीसी) या महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक प्रकल्पाचे काम हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने (एचसीसी) इतर भागीदारांच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.
- श्रीनगरपासून 80 किलोमीटर अंतरावर मंत्रीगाममध्ये जलविद्युत प्रकल्प आहे, तर तेथून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर किशनगंगा धरण उभारण्यात आले आहे. धरणातून जलविद्युत प्रकल्पापर्यंत तयार करण्यात आलेला बोगदा हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.
दिनविशेष :
- समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा 22 मे 1772 रोजी जन्म झाला.
- विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म सन 1783 मध्ये 22 मे रोजी झाला.
- सन 1906 मध्ये राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.
- 22 मे 1972 रोजी सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
- भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 रोजी सूत्रे हाती घेतली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा